मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाचा डंका वाजवत लोकप्रियता मिळवणारे दिग्गज अभिनेते अर्थात विक्रम गोखले. नव्हतंच सर्व काही आहे अशीच त्यांची ख्याती आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बालपणापासूनच आणि घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या विक्रम यांनी त्यांच्या मोठ्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तमोत्तम आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. अतिशय प्रगल्भ आणि स्पष्ट विचार असणारा अभिनेता अशी त्यांची दुसरी ओळख होती. मात्र दुर्दैवाने नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी अभिनय काही सोडला नाही.
![](https://masalamanoranjan.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Image-2023-10-31-at-9.21.25-AM-1.jpeg)
विक्रम गोखले यांनी आजारी असूनही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. असाच त्यांचा एक शेवटचा सिनेमा म्हणजे ‘सूर लागू दे’. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘सूर लागू दे’ हा सिनेमा रसिकांच्या मनाचे सूर छेडण्यासाठी सज्ज झाला आहे.
![](https://masalamanoranjan.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Image-2023-10-31-at-9.21.25-AM-2.jpeg)
३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो. याच दिवसाचे औचित्य साधत बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते ‘सूर लागू दे’च्या नवीन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला अनिल कालेलकर, मनोज पाखाडे, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकारांसह सिनेसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी विक्रम गोखलेंच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या अखेरच्या कामाची माहिती काहींनी दिली, तर त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढताना काहींचा कंठ दाटून आला.
![](https://masalamanoranjan.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Image-2023-10-31-at-9.21.25-AM-3.jpeg)
आयुष्याच्या संध्याकाळचे एक विलोभनीय चित्र या चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आले आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीवेचे भान राखून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अभिनेत्री रीना मधुकर आणि ‘कलियों का चमन…’ फेम मेघना नायडू या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज असणार आहेत. त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.