फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे.
क्रांती रेडकर वानखेडे यांनी यापूर्वी ‘काकण’ या चित्रपटातून संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळला होता. आता त्या नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ‘मैत्रेया’ या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे.
चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमधून कथेबाबत फारसा खुलासा करण्यात आलेला नसला, तरी चार प्रमुख पात्रांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. समर, आयुषी, स्काय आणि रुची ही पात्रं या कथानकाचा केंद्रबिंदू असणार असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट होते. मात्र या चौघांमधील नातं नेमकं कशा वळणांमधून पुढे जाणार, याबाबतची माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच ‘मैत्रेया’मध्ये मैत्रीच्या विविध छटा, नात्यांमधील गुंतागुंत आणि काळानुसार बदलणारे भावविश्व यांचा वेध घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटाविषयी बोलताना लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, “‘मैत्रेया’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या मैत्रीची गोष्ट आहे, जी काळ बदलला तरी मनात कायम राहाते. या चित्रपटातून मैत्रीचे अनेक रंग, नात्यांची गुंतागुंत आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळतील. ‘काकण’नंतर पुन्हा एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे. ‘मैत्रेया’चा हा प्रवास लवकरच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
सध्या चित्रपटाची केवळ घोषणा करण्यात आली असून, कलाकारांची संपूर्ण फळी, प्रदर्शनाची तारीख आणि इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समोर आलेल्या या घोषणेमुळे ‘मैत्रेया’बाबतची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
=======
हे देखील वाचा : ‘यावेळी तिसराच आहे!’… ‘झिम्मा ३’च्या पहिल्या पोस्टरने वाढवला सस्पेन्स
========