नेटफ्लिक्सवरील ‘The Ba***ds of Bollywood’ या वेब सीरिजविरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेली मानहानी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी ऐकण्यास नकार दिला. या प्रकरणावर दिल्ली न्यायालयाला अधिकारक्षेत्र (territorial jurisdiction) नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी दिलेल्या आदेशात सांगितले की, वानखेडे यांनी संबंधित अधिकार असलेल्या न्यायालयात ही याचिका दाखल करावी.
“या प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकार या न्यायालयाकडे नाही. त्यामुळे ही याचिका परत करण्यात येत आहे,” असे न्यायालयाने नमूद केले.
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत असा आरोप केला होता की, आर्यन खान दिग्दर्शित या वेब सीरिजमधील कथानक आणि पात्रे मुद्दाम त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. 2021 मधील ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर सूडबुद्धीने ही सीरिज तयार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.
वानखेडे यांच्या मते, सीरिजमध्ये दाखवलेले काही प्रसंग व व्यक्तिरेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी साधर्म्य साधणाऱ्या असून त्यामुळे त्यांची बदनामी होत आहे. याप्रकरणी त्यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स विरोधात २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. विशेष म्हणजे ही रक्कम मिळाल्यास ती टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.
याशिवाय, सीरिजमधील एका पात्राकडून ‘सत्यमेव जयते’ हा राष्ट्रीय बोधवाक्य उच्चारल्यानंतर मिडल फिंगर दाखवण्याचा प्रसंग दाखवण्यात आल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला. हा प्रकार राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला होता.
‘The Ba***ds of Bollywood’ ही वेब सीरिज आर्यन खान यांनी लिहिली व दिग्दर्शित केली असून, या मालिकेत लक्ष्य आणि सहेर बंबा प्रमुख भूमिकेत आहेत.
तसेच बॉबी देओल, मोना सिंग, राघव जुयाल, मानव चौहान आणि अनन्या सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज गौरी खान आणि बॉनी जैन यांच्या निर्मितीत, शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनरखाली तयार करण्यात आली आहे.