मराठी डिजिटल माध्यमात आशयपूर्ण संवादांची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘CatchUp’ या मुलाखत मालिकेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पत्रकार आणि दिग्दर्शक अमोल परचुरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे १०० भाग पूर्ण झाले असून, अवघ्या दोन वर्षांत हा प्रवास पूर्ण झाल्याने मराठी डिजिटल कंटेंट क्षेत्रात त्याची विशेष दखल घेतली जात आहे.
या मालिकेचा पहिला भाग १ मे २०२४ रोजी ज्येष्ठ कलावंत अशोक हांडे यांच्या मुलाखतीने सुरू झाला होता. सुरुवातीपासूनच चर्चेपेक्षा आशय, गॉसिपपेक्षा विचार आणि सखोल संवाद यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न ‘CatchUp’मध्ये दिसून आला. त्यामुळे प्रत्येक भाग केवळ मुलाखत न राहता, प्रेक्षकांसाठी माहितीपूर्ण आणि विचारांना चालना देणारा संवाद ठरला.
या प्रवासात चित्रपट, नाटक, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ‘CatchUp’मध्ये सहभाग नोंदवला. शान, अतुल कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, कुणाल विजयकर, मकरंद देशपांडे, महेश लिमये, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, नीना कुळकर्णी, आदिती गोवित्रीकर, भीमराव पांचाळे, महेश मांजरेकर, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, स्वानंद किरकिरे आणि अजिंक्य देव यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मुलाखतींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाज, विज्ञान, मानसिक आरोग्य, उद्योजकता, इतिहास, साहित्य आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरही या मालिकेत चर्चा करण्यात आली. विशाल कामत, डॉ. राजेंद्र बर्वे, सोनाली लोहार, इंद्रनील वर्तक, अनिरुद्ध राजदेरकर आणि अच्युत गोडबोले यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी झालेल्या संवादांमुळे या मालिकेचा विषय विस्तारत गेला.
या प्रवासातील एक उल्लेखनीय भाग म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची दोन भागांमध्ये सादर करण्यात आलेली विस्तृत मुलाखत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सखोल आढावा या संवादातून घेण्यात आला. अशा मुलाखती भविष्यात मराठी सांस्कृतिक इतिहासाच्या दस्तऐवजीकरणासाठीही महत्त्वपूर्ण ठरू शकतात, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
‘CatchUp’चा १०० वा भागही वेगळ्या संकल्पनेवर आधारित होता. एखाद्या व्यक्तीची मुलाखत सादर करण्याऐवजी मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाशी घट्ट नातं असलेल्या ‘भारतमाता चित्रपटगृह’ या वारसास्थळावर विशेष भाग साकारण्यात आला. गिरणगावाचा सांस्कृतिक वारसा आणि मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळाशी जोडलेल्या या ऐतिहासिक स्थळाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या भागातून करण्यात आला.
दरम्यान, ‘CatchUp’चा १०१ वा भाग ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची सखोल मुलाखत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शंभर भागांचा टप्पा पार केल्यानंतरही विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे अनुभव, विचार आणि कार्य अधिक व्यापक स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ‘CatchUp’च्या टीमने व्यक्त केला आहे.
=======
हे देखील वाचा : ‘घबाडकुंड’च्या यशानंतर प्रीतम एस. के. पाटील ठरले मराठी हॉरर सिनेमाचा नवा चेहरा
=======