बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक गायकीतून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अरिजीतने ही माहिती त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली , जिथे त्यांनी चाहत्यांचे आभार मानले.
त्यांनी लिहिले आहे,
“हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या वर्षांमध्ये मला जेवढं प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी आनंदाने सांगतो की आता मी प्लेबॅक गायकीसाठी कोणतीही नवीन कामं घेणार नाही. मी याला समाप्त करतो. ही एक अद्भुत यात्रा होती.”
अरिजीत सिंग यांची सुरवात २००५ मध्ये रिअॅलिटी शो Fame Gurukul मध्ये सहभाग घेऊन झाली. त्यानंतर २०११ मध्ये Murder २ या चित्रपटातील “Phir Mohabbat” गाण्याने प्लेबॅक गायकीत त्यांनी पदार्पण केले.
त्यांचा मोठा टप्पा २०१३ मध्ये आला, जेव्हा Aashiqui 2 मधील “Tum Hi Ho” ह्या गीताने त्यांना सर्वत्र ओळख दिली. या गाण्याच्या यशाने त्यांना घराघरांत पोहोचवले.
यानंतर अरिजीत सिंग बॉलिवूडमधील सर्वात सर्वोत्तम आवाजांपैकी एक म्हणून उदयाला आले. प्रेम, हृदयभंग, आनंद अशा विविध भावनांना सहजतेने आपल्या गायकीतून सादर केले. त्यांनी “Channa Mereya”, “Agar Tum Saath Ho”, “Raabta”, “Kesariya”, “Gerua”, “Ae Dil Hai Mushkil”, “Chaleya” अशी अनेक हिट गाणी दिली आहेत.
त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातील सुपरस्टार्सपासून ते नवीन अभिनेत्यांपर्यंत सर्वांच्या गाण्यांना आपला आवाज दिला, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांचा त्यात समावेश आहे.
अरिजीतने हिंदीसह बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि देशातील प्रमुख संगीतकार आणि दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे.
संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा समावेश आहे.
गत वर्षी जुलैमध्ये, त्यांनी Spotify वर Taylor Swift आणि Ed Sheeran ला मागे टाकत सर्वात जास्त फॉलोअर्स (151 दशलक्ष) असलेला कलाकार होण्याचा मान मिळवला.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत, आणि 2025 मध्ये पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले.
परंतु, अरिजीतने निवृत्ती घेण्यामागील कारणांची कोणतीही माहिती दिलेली नाही, तसेच भविष्यातील योजना देखील अजूनपर्यंत जाहीर केल्या नाहीत.