पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘WAVES 2025’ या जागतिक चित्रपट व मनोरंजन शिखर संमेलनात भारतीय सिनेसृष्टीतील पाच दिग्गजांना टपाल तिकिटांद्वारे अमर केलं.
मुंबईतील Jio World Centre येथे पार पडलेल्या भव्य समारंभात, पंतप्रधान मोदींनी गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या स्मरणार्थ खास टपाल तिकिटांचे अनावरण केले. या कलाकारांनी केवळ मनोरंजनच दिलं नाही, तर भारतीय मनाला आणि जगाला अंतर्मुख करणारा विचारही दिला.
या पाच दिग्गजांची ओळख थोडक्यात:
गुरु दत्त: ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ यांसारख्या कालातीत चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक. त्यांनी दुःख, स्वप्नं आणि जीवनातील विसंगती फार प्रभावीपणे पडद्यावर साकारली. पी. भानुमती: एक अष्टपैलू अभिनेत्री, गायिका आणि लेखिका – दक्षिण भारतातील पहिल्या महिला दिग्दर्शकांपैकी एक. राज खोसला: थरार, रहस्य आणि प्रेमकथांनी नटलेले चित्रपट बनवणारे प्रतिभावान दिग्दर्शक. ऋत्विक घटक: सामाजिक वास्तवावर आधारित कलात्मक सिनेमांचा स्तंभ. त्यांच्या सिनेमांनी समाजाला आरसा दाखवला. सलील चौधरी: एक संगीतातील जादूगार, ज्यांनी पाश्चिमात्य व भारतीय सुरांचं अपूर्व मिश्रण सादर केलं.
WAVES 2025 – भारताचं सॉफ्ट पॉवर आणि सांस्कृतिक नेतृत्व
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारतीय चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांहून अधिक प्रवासाची आठवण करून दिली. ‘राजा हरिश्चंद्र’ पासून ते OTT च्या युगापर्यंत, भारतीय सिनेमा आता जागतिक मंचावर दृढपणे उभा आहे.
या कार्यक्रमातील ‘क्रिएटोस्फिअर’ या विशेष सत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय निर्मात्यांशी संवाद साधला. या संवादातून भारत ‘कंटेंट हब’ म्हणून पुढे येत असल्याचं स्पष्ट झालं.