जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत, रितेश देशमुख यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार!
रितेश देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि त्यांच्या अभिनयाने सजलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे २०२६ रोजी, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये, संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असून, महाराष्ट्राचे हे राजे अखिल भारतात आणि जगभरात पुन्हा एकदा गौरवाने झळकणार आहेत.
या चित्रपटात रितेश देशमुख यांच्यासोबत अभिनेते संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनीलिया देशमुख यांचा समावेश असून, एक भव्य कलाकारांचा ताफा मोठ्या पडद्यावर शिवकालीन सृष्टी उभी करणार आहे.
‘राजा शिवाजी’ ही त्या काळातील कथा आहे, जेव्हा जनतेवर अन्याय होत असताना, एका धाडसी योद्ध्याने स्वराज्याच्या स्वप्नासाठी सिंहाचा गर्जना केली. महाराजांचा हा प्रेरणादायी संघर्ष आणि सत्त्वगौरव, आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
या चित्रपटाद्वारे संतोष सिवन मराठीत पदार्पण करत असून अजय-अतुल यांचे जोशपूर्ण संगीत चित्रपटात ऐकायला मिळेल. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि वाई येथे सुरू आहे.
जिओ स्टुडिओजच्या अध्यक्ष ज्योती देशपांडे म्हणाल्या, “‘राजा शिवाजी’ हा फक्त चित्रपट नाही, तर स्वराज्याची साक्ष आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं ही एक जबाबदारी होती आणि रितेश आणि जिनीलिया या दोघांनी ही जबाबदारी उत्कटतेने पार पाडली आहे. भारतभर आणि परदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.”
दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता रितेश देशमुख म्हणाले, “महाराज हे केवळ इतिहास नाहीत, तर ते प्रत्येक मराठी आणि भारतीय हृदयात धडधडणारी भावना आहेत. या भूमिकेला न्याय देणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. महाराष्ट्र दिनी हा चित्रपट सादर करताना मन भरून आलं आहे.”
जिनीलिया देशमुख, निर्माती – मुंबई फिल्म कंपनी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे आमचा शिवरायांप्रती असलेला निस्सीम आदर. हे आमचं स्वप्न जिओ स्टुडिओजच्या साथीनं साकार होतं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की, ही कथा जगभर पोहोचवता येणार आहे.”
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नक्कीच भारतीय प्रेक्षकांच्या मनामध्ये एक अमीट छाप सोडणारा ऐतिहासिक प्रवास ठरणार आहे.