भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णपानावर कोरलेलं एक नाव म्हणजे ‘शोले’. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली आणि सलीम-जावेद यांच्या लेखणीतून साकारलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपट इतिहासात अमर झाला. ५० वर्ष पूर्ण करत असताना, लाखो प्रेक्षक आजही त्याचा आनंद घेतात. मात्र, या कथेचे सहलेखक जावेद अख्तर यांनी तब्बल पाच दशकं हा चित्रपट पुन्हा पाहिलाच नाही. आणि यामागचं कारण त्यांनी अलीकडेच उघड केलं.
६ वर्षांत साकारलेला, तीन कोटी खर्चाचा ‘शोले’
‘शोले’च्या निर्मितीला तब्बल सहा वर्ष लागली. सुरुवातीला एक कोटी रुपये असलेला बजेट शेवटी तीन कोटींवर पोहोचला. तरीही प्रदर्शित होताच चित्रपटाने रेकॉर्डब्रेक यश मिळवलं. अमिताभ बच्चन, संजीव कुमार, धर्मेंद्र, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन, मॅक मोहन अशा तगड्या कलाकारांनी या कथेला जिवंत केलं. १९७५ मध्ये ‘मुगल-ए-आझम’चा विक्रम मोडून ‘शोले’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम १९८२ मध्ये ‘डिस्को डान्सर’पर्यंत टिकला, पण आजही सर्वाधिक तिकीट विक्रीचा मान ‘शोले’कडेच आहे.
जावेद अख्तर यांनी का पाहिला नाही पुन्हा ‘शोले’?
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले,
“तुमच्या कामाचं कौतुक झालं, तर आनंद व्हायला हवा. पण त्याचं क्रेडिट घेण्यात अडकून पडणं योग्य नाही. भूतकाळात अडकून राहणाऱ्यांना भविष्याची आशा राहत नाही. तुम्ही नेहमी तितकेच महत्त्वाचे असता, जितकं तुमचं सध्याचं काम तुम्हाला ठरवतं.”
त्यांनी सांगितलं की ‘शोले’ प्रदर्शित झाल्यावर सुरुवातीला नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या, म्हणून त्यांनी ती ५-६ वेळा पाहिली. नंतर ७० मिमी आवृत्ती आली तेव्हा एकदा पाहिला. पण त्यानंतर त्यांनी कधीच पाहिला नाही. कारण, त्यांना स्वतःच्या जुन्या चित्रपटांकडे परत पाहणं आवडत नाही.

गब्बरच्या भूमिका खरी घटना
‘शोले’मधील गब्बर सिंहचं पात्र आजही सिनेसृष्टीतील सर्वात संस्मरणीय खलनायकांपैकी एक मानलं जातं. अमजद खान यांनी साकारलेलं हे पात्र खरं तर एका सत्यकथेवर आधारित होतं. सलीम खान यांच्या वडिलांनी त्यांना एकदा एका डाकू गब्बर सिंहची गोष्ट सांगितली होती, ज्याने पोलिसांना नाकीनऊ आणले होते. त्याच कथेवरून गब्बरचं पात्र जन्माला आलं.
फ्लॉप ते सुपरहिटचा प्रवास
प्रदर्शनाच्या पहिल्या काही दिवसांत ‘शोले’ला फ्लॉप म्हटलं जात होतं, पण तोंडी प्रसिद्धीमुळे चित्रपटाने जादू केली. ५० वर्षांपूर्वी ३५ कोटींची कमाई करणं म्हणजेच एक अफाट विक्रम होता. आणि आजही ‘शोले’ भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक अजरामर मैलाचा दगड आहे.