स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनांपासून मुक्त होणे नाही, तर स्वतःचे विचार मांडण्याचे धैर्य, आपल्या स्वप्नांसाठी निर्णय घेण्याची ताकद आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही आहे. पडद्यावरच्या व्यक्तिरेखांमधून हा विचार मांडणाऱ्या दोन अभिनेत्रींची भूमिका आता त्यांच्या वैयक्तिक विचारांमधूनही समोर आली आहे.
‘कमळी’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अभिनेत्री विजया बाबरने आपल्या हक्कांसाठी आणि स्वप्नांसाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. आपल्या मातीशी असलेलं नातं जपणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील प्रेक्षक या व्यक्तिरेखेशी जोडले गेले आहेत.
दुसरीकडे, ‘दीपज्योती’ मालिकेतील ज्योतीची भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे. स्वतःच्या विचारांवर ठाम राहणारी आणि आपल्या माणसांसाठी उभी राहणारी ज्योतीही स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा विचार मांडते.
विजया बाबरच्या मते, डिजिटल माध्यमांमुळे सामान्य माणसाला आपले विचार मांडण्यासाठी पूर्वीपेक्षा मोठी संधी मिळाली आहे. शिक्षणाच्या अनेक संधींपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल क्रांतीमुळे विविध गोष्टी शिकता आणि समजून घेता येत असल्याचे ती सांगते.
बदलत्या भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तिने मांडला. भारतीय संस्कृतीबद्दल वाढणारा अभिमान मनोरंजन क्षेत्रातही दिसून येत असून, काल्पनिक कथांसोबतच आपल्या घराशी, मातीशी आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा अधिक प्रमाणात समोर येत असल्याचे विजया बाबरचे म्हणणे आहे. अशा कथांमुळे कलाकारांसोबत प्रेक्षकही विचारांच्या पातळीवर घडत असल्याचे तिला वाटते.
स्वातंत्र्याची स्वतःची व्याख्या सांगताना विजया म्हणते की, भीती न बाळगता मनमोकळेपणाने जगण्याला तिच्यासाठी महत्त्व आहे. कलाकार म्हणून कोणत्याही एका बाजूची भूमिका न घेता मानवी भावना प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.
आजची स्त्री कणखर आणि अभ्यासू असतानाच भावनाशीलही आहे, या दोन्ही बाजू तिला महत्त्वाच्या वाटतात. मात्र, वैयक्तिक स्वातंत्र्यासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव असणेही तितकेच गरजेचे असल्याचे तिचे मत आहे.
नवीन पिढीने स्वतःच्या प्रगतीसोबत आपल्या माणसांचा आदर करावा आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे, असे विजया बाबर सांगते. प्रत्येक व्यक्तीचा निर्णय समाजावर परिणाम करत असतो आणि समाजाचा भाग म्हणून योग्य बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासून व्हायला हवी, असा विचार तिने व्यक्त केला.
पूर्वा कौशिकच्या मते, गेल्या काही वर्षांत सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल म्हणजे स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी वाढलेला आत्मविश्वास. लोक आता आपल्या मतांबद्दल अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत, असे ती सांगते.
सोशल मीडिया हे आजच्या पिढीच्या हातातील महत्त्वाचे माध्यम असल्याचे पूर्वाचे म्हणणे आहे. लोकशाही, राजकारण, शिक्षण, रोजगार यांसारख्या विविध विषयांवर या माध्यमातून व्यक्त होता येते. आपल्या आसपास काय घडत आहे, याची माहिती मिळवून जागरूक राहण्याची संधीही सोशल मीडियामुळे मिळते.
पूर्वासाठी स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःचे मत स्पष्टपणे मांडता येणे हा आहे. ती स्वतःला काहीशी बंडखोर वृत्तीची मुलगी मानते आणि आपल्या भूमिकांमधूनही ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगते.
मात्र, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असल्याचे पूर्वा स्पष्टपणे सांगते. स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार असला तरी आपल्या शब्दांनी किंवा कृतीने दुसऱ्याचा अपमान होणार नाही, याची जाणीव असणे आवश्यक आहे. स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहताना इतरांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तिचे मत आहे.
आजची पिढी आपल्या स्वप्नांबाबत अधिक ठाम आहे आणि त्यासाठी धाडसाने पुढे जाण्याची तयारी तिच्यात आहे, ही बाब पूर्वाला सकारात्मक वाटते. मात्र, या आत्मविश्वासासोबत संवेदनशीलता आणि जबाबदारीही कायम राहायला हवी, असे ती सांगते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विजया बाबर आणि पूर्वा कौशिक यांनी मांडलेले विचार स्वातंत्र्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन समोर आणतात. स्वतःचे विचार, स्वप्नं आणि अधिकार जपत असतानाच इतरांचा आदर आणि सामाजिक जबाबदारी विसरू नये, हा त्यांच्या भूमिकेचा मुख्य सूर आहे.
========
हे देखील वाचा : पुष्कर श्रोत्रींच्या ‘झिम्माड’मध्ये मराठी कलाकारांचा पावसाळी जल्लोष
========