Nilu Phule Death Anniversary: १९७२ च्या दुष्काळात घरात अन्न नव्हतं, तरी निळू फुलेंनी प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही

१९७२ च्या दुष्काळातही प्रामाणिकपणाशी तडजोड न करणारे अभिनेते निळू फुले.

Nilu Phule Death Anniversary: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या प्रभावी खलनायकी भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. मात्र अभिनयाइतकंच त्यांचं साधं, प्रामाणिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या आयुष्यातील १९७२ च्या भीषण दुष्काळाशी संबंधित एक प्रसंग आजही आवर्जून सांगितला जातो.

त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. अनेक कुटुंबांप्रमाणेच निळू फुले यांच्या घरची आर्थिक परिस्थितीही कठीण होती. त्या दिवसांत अभिनेते राम नगरकर काही काळ त्यांच्या घरी राहत होते. एकदा कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी निळू फुलेंच्या आईने त्यांना घरखर्चासाठी पैसे मागितले. घरात धान्यही संपल्याचं सांगत त्यांनी एका पोत्याकडे बोट दाखवलं आणि त्यातून थोडं धान्य घेण्याची परवानगी मागितली. नंतर धान्य आणल्यानंतर ते परत भरून ठेवू, असंही त्यांनी सांगितलं.

मात्र ते धान्य त्यांच्या घरचं नव्हतं. १९७२ च्या दुष्काळात गरजूंसाठी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेलं धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी ते निळू फुले यांच्या घरी ठेवण्यात आलं होतं. स्वतःच्या घरात अन्नाचा तुटवडा असतानाही निळू फुलेंनी त्या धान्याला हात लावण्यास स्पष्ट नकार दिला. सार्वजनिक विश्वासाला तडा जाऊ नये, ही त्यामागची त्यांची भूमिका होती. त्यांच्या प्रामाणिकपणाचं हे उदाहरण आजही अनेकांना प्रेरणा देतं.

तरुणपणापासून निळू फुलेंचा राष्ट्र सेवा दलाशी जवळचा संबंध होता. त्यावेळी मिळणाऱ्या सुमारे ८० रुपयांच्या मासिक पगारातून ते नियमितपणे दहा रुपये संघटनेच्या कामासाठी देत असत. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून त्यांनी सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता.

अभिनय क्षेत्रातही निळू फुलेंनी अमिट ठसा उमटवला. ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही गाजतात. रंगभूमीवर ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’ आणि ‘बेबी’ या नाटकांतील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.

निळू फुले यांनी पडद्यावर अनेकदा कठोर आणि निर्दयी व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र त्यांच्या वास्तविक आयुष्यातील साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकपणा यामुळे ते आजही मराठी रसिकांच्या मनात खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ म्हणून कायम आहेत.

======

हे देखील वाचा : ‘Welcome To The Jungle’ Review: अक्षय कुमारची कॉमेडी पुन्हा फॉर्ममध्ये; भरपूर हशा, थोडा गोंधळ!

======

Spread the love

Related posts

लता मंगेशकरांच्या सावलीतून स्वतःची ओळख घडवणाऱ्या आशा भोसले १२ हजार गाण्यांचा अजरामर वारसा

वयाच्या 80 व्या वर्षी आशा भोसले यांचं अभिनयात पदार्पण, ‘माई’ मधील भूमिका ठरली होती खास

होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिलाच फोटो! ज्ञानदा रामतीर्थकरचा थाटामाटात साखरपुडा; ‘H’ आहे तरी कोण?

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More