फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागली की हवेत आपोआप एक वेगळीच रोमँटिक भावना दरवळू लागते. प्रेमाचे हलकेसे वारे मनाला स्पर्श करतात आणि १४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे – या खास दिवसाची उत्सुकता वाढू लागते. वर्षभर मनात दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून ओठांवर येतं.
याच प्रेमाच्या वातावरणात अभिनेत्री नम्रता गायकवाड यंदा काहीतरी खास आणि वेगळं घेऊन येत आहे. तिच्या सोशल मीडियावर नुकतेच अभिनेता तुषार कावळे याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले आणि चर्चांना उधाण आलं. हे दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत का? की या फोटोमागे काही वेगळं कारण आहे?
या चर्चांना पूर्णविराम देत समोर येत आहे त्यांचं नवं, फ्रेश सोलो गाणं – ‘काहीतरी वेगळे’. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर हे गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे.
हे गाणं केवळ एका जोडप्याची प्रेमकथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांवरही भाष्य करतं. आपण खरंच क्षण जगतोय की फक्त सोशल मीडियावर पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न गाण्यातून प्रभावीपणे मांडला जातो. म्हणूनच ‘काहीतरी वेगळे’ हे फक्त रोमँटिक गाणं नाही, तर वास्तवाचंही प्रतिबिंब आहे.
फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन आणि गीतलेखन आरोह कांगो यांनी केलं आहे. देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं अधिक भावस्पर्शी झालं आहे.
गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, सह-दिग्दर्शक म्हणून मयूर परांकर यांनी साथ दिली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून स्वप्नील पाटील यांनी प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे. संगीत निर्मिती अफलातून म्युझिकची असून, प्रकल्प प्रमुख म्हणून रेखा मोरे आणि निलेश खंडागळे कार्यरत आहेत.
भावना, वास्तव आणि प्रश्नांची सुंदर गुंफण असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं आजच्या पिढीला नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल, यात शंका नाही.